वसई डेपो परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर?
चार ते सहा मद्यधुंद तरुणांकडून गावकऱ्याला लुटण्याचा प्रयत्न; मदतीला आलेल्या रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला; २६ टाके पडले
योगेश पांडे / वार्ताहर
वसई – वसई डेपो परिसरात २२ वर्षीय रिक्षाचालकावर चार ते सहा अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने हल्ला करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरिफ अन्सार खान असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर सध्या डीएम पेटिट हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरिफ हा मंगळवारी रात्री वसई डेपो येथे प्रवासी घेण्यासाठी उभा होता. त्यावेळी चार ते सहा मद्यधुंद तरुण एका त्याच्या ओळखीच्या व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार पाहून आरिफ त्या तरुणाला वाचवण्यासाठी पुढे गेला. मात्र याच कारणावरून संबंधित इसमांनी त्याच्यावरच हल्ला चढवला. धारदार शस्त्राने त्याच्या चेहऱ्यावर व पाठीवर वार करण्यात आले. रक्तबंबाळ अवस्थेतही आरिफने आरडाओरड केल्याने स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले. मात्र हल्लेखोर तेथून पसार झाले. या हल्ल्यात आरिफला गंभीर दुखापत झाली असून त्याला तब्बल २६ टाके पडले आहेत
या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ११५ आणि ११८ अन्वये चार ते सहा अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, एवढी गंभीर मारहाण होऊन २६ टाके पडले असतानाही केवळ सौम्य कलमांखाली गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. माणिकपूर पोलिस पुढील तपास करत आहेत.
चार ते सहा मद्यधुंद तरुण आपल्या गावातील व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न करत होते. मी तिथून जाताना त्याने मला आवाज दिला त्यानंतर मी त्याच्या मदतीसाठी गेलो, तेव्हा ते सगळे माझ्या अंगावर धावून आले, ते म्हणाले तू कोण आहे, मी त्यांना सांगितलं आम्ही शेजारी राहतो, पण त्यांनी आम्हाला मारहाण करायला सुरूवात केली, जवळचे पैसे देखील दे नाहीतर मारू अशी धमकी देत देत होते, ही घटना रात्री १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली, मी आणि तो मुलगा आम्ही दोघंच होतं, अशी माहिती जखमी झालेल्या आरीफ खान याने दिली आहे.
जखमी आरिफ खानने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री सुमारे १२ ते १२.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. “मी तिथून जात असताना आमच्या गावातील ओळखीच्या व्यक्तीने मदतीसाठी आवाज दिला. त्याला चार ते सहा मद्यधुंद तरुणांनी घेरले होते आणि लुटण्याचा प्रयत्न सुरू होता. मी त्याला वाचवण्यासाठी पुढे गेलो, मात्र त्यांनी उलट माझ्याच अंगावर धाव घेतली. ‘तू कोण आहेस?’ असे विचारत शिवीगाळ सुरू केली. मी आम्ही शेजारी राहतो असे सांगितले, तरीही त्यांनी मारहाण सुरू ठेवली. जवळचे पैसे दे, नाहीतर मारून टाकू, अशी धमकी देत ते वार करत होते,” असे आरिफने सांगितले.
दरम्यान, या घटनेमुळे वसई डेपो परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मध्यरात्री सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे धारदार शस्त्राने हल्ला होणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. माणिकपूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.