सोलापुरात ढाब्यावर ईव्हीएम मशीन आढळल्याने खळबळ; राष्ट्रवादीचे नेते संतापले
योगेश पांडे / वार्ताहर
सोलापुर – राज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान पार पडले. शनिवारी सकाळी साडे सात वाजल्यापासून सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान पार पडले. मतदानानंतर आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता आहे. मात्र निकालाआधीच सोलापूरमध्ये हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सोलापूरमध्ये एका धाब्यावर ईव्हीएम मशीन आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत मोहोळ मतदारसंघातील राजकारण मध्यरात्री एका वेगळ्याच वळणावर पोहोचले. मोहोळ शहराजवळील एका हॉटेल आणि बारच्या परिसरात ईव्हीएम मशिन आढळून आल्याने लोकशाहीच्या या उत्सवात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मोहोळ शहराजवळील ‘स्वराज्य बार अँड हॉटेल’ परिसरात काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती उमेश पाटील यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने कार्यकर्त्यांसह तिथे धाव घेतली असता, काही व्यक्तींच्या ताब्यात ईव्हीएम मशीन असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पाटील यांनी संबंधित व्यक्तींना जाब विचारत हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला.
एका खाजगी हॉटेलच्या परिसरात ईव्हीएम मशीन काय करत होत्या? हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेची माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर आणि तहसीलदार सचिन मुळीक यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, या मशीन्स ‘राखीव’ स्वरूपातील होत्या.
मात्र, राखीव मशिनची ने-आण करताना आवश्यक असलेली सुरक्षा व्यवस्था आणि नियम पाळले गेले होते का? हा कळीचा मुद्दा ठरत आहे. उमेश पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप केला आहे.