डिजिटल अटक दाखवून ज्येष्ठाची साडेतेवीस लाखांची फसवणूक; कल्याणमध्ये सायबर भामट्यांचा धुमाकूळ
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : डिजिटल अटकेची (डिजिटल ॲरेस्ट) भीती दाखवून कल्याणमधील ६८ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीकडून तब्बल २३ लाख ५० हजार रुपये ऑनलाईन उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्याच आठवड्यात कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरात एका वृद्ध महिलेकडून ६३ लाख रुपये उकळल्याची घटना ताजी असतानाच, अशाच स्वरूपाची ही दुसरी फसवणूक झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
कल्याण पश्चिमेकडील रहेजा कॉम्पलेक्स परिसरात राहणारे अब्दुस सबूर सरदारअली (६८) यांना दोन अज्ञात भामट्यांनी लक्ष्य केले. ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत मोबाईलवरील व्हिडीओ कॉल आणि व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधत, “तुमचे आर्थिक व्यवहार संशयास्पद आहेत. तुम्ही काही गैरव्यवहारांशी संबंधित आहात. तुम्हाला अटक होऊ शकते,” अशी भीती दाखवण्यात आली. ही कारवाई टाळण्यासाठी सहकार्य आवश्यक असल्याचे सांगत भामट्यांनी सरदारअली यांना त्यांच्या बँक खात्यातून आरटीजीएसद्वारे रक्कम वळती करण्यास भाग पाडले.
सलग काही दिवस डिजिटल अटकेची दहशत निर्माण करून भामट्यांनी सरदारअली यांच्याकडून एकूण २३ लाख ५० हजार रुपये उकळले. घडलेला प्रकार परिचितांना सांगितल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सरदारअली यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्याअन्वये दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत. सरदारअली यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील शंकरपूर असून, सध्या ते कल्याणमध्ये वास्तव्यास आहेत. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस यंत्रणेसमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे.