वडापावचा स्टॉल लावण्यावरून रक्तरंजित थरार; गोराईच्या पगोड्याजवळ तरुणाचा निर्घृण खून
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईच्या गोराई येथील प्रसिद्ध पर्यटन ठिकाण ‘पगोडा’ जवळ एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. एका वृद्ध दाम्पत्यासह त्यांच्या नातेवाईकांनी तरुणावर कोयत्याने वार केला. हा हल्ला इतका भयंकर होता की तरुणाचा जागीच मृत्यू झाला. वडापावचा स्टॉल लावण्यावरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टॉलच्या जागेवरून सुरू असलेल्या भांडणातून एका ज्येष्ठ दाम्पत्याने आपल्या काही नातेवाईकांसह मिळून एका ३७ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यासाठी त्यांनी कोयता आणि इतर धारदार शस्त्रांचा वापर केला. या क्रूर हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गोराई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून, या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असून चौकशी सुरू आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृत तरुण आणि आरोपी हे दोघेही भाईंदरचे रहिवासी आहेत आणि ते गेल्या अनेक वर्षांपासून गोराई परिसरातील ‘पगोडा’जवळ वडापावचे स्टॉल चालवत होते. मागील पाच वर्षांपासून स्टॉल लावण्याच्या जागेवरून त्यांच्यात सातत्याने वाद सुरू होता. हा जुना वाद शनिवारी रात्री टोकाला गेला आणि त्यातून ही भीषण घटना घडली.
स्टॉल लावण्याच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा क्रूरपणे खून झाल्यामुळे गोराई परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. गोराई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. लवकरच आरोपींना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.