अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; वाहनांचा वेग आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या गाडीने दिलेल्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली होती. या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कुसुम विष्णु सुदे (३०) असं मृत महिलेचं नाव आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा तेलगाव–धारूर महामार्गावरून जात असताना धूनकवड फाटा येथे ही दुर्घटना घडली होती. यात सुदे पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या होत्या. यामध्ये मंगळवारी उपचारादरम्यान कुसुम विष्णू सुदे यांचा मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
ताफ्यातील वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत कुसुम सुदे, त्यांचे पती विष्णु दामोदर सुदे (३५ ) आणि दोन लहान मुली रागिणी (९) व अक्षरा (६) गंभीर जखमी झाले होते. या अपघातात दुचाकी चक्काचूर झाली होती आणि चारही जण रस्त्यावर फेकले गेले. स्थानिकांनी तातडीने तत्परता दाखवत जखमींना धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.आज उपचारादरम्यान कुसुम सुदे यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान या घटनेने ताफ्यातील वाहनांच्या वेग आणि सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना उपमुख्यमंत्री अजित पवार परतूरहून औसा येथे एका प्रचारसभेसाठी जात असताना घडली होती. तेलगाव–धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे ताफ्यातील अग्निशमन दलाच्या गाडीने विष्णू सुदे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, दुचाकीचा पूर्णपणे चुराडा झाला आणि दुचाकीवरील सुदे पती-पत्नी आणि त्यांच्या दोन लहान मुली रस्त्यावर फेकल्या गेल्या. ताफ्यातील वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत कुसुम सुदे, त्यांचे पती विष्णू दामोदर सुदे आणि त्यांच्या दोन निष्पाप मुली रागिणी व अक्षरा हे चौघेही गंभीर जखमी झाले होते. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या कुसुम विष्णू सुदे यांचा मृत्यू झाला.