संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्जवल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – सगळ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या आणि मागच्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर उज्जवल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली आहे. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपल्या सात मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. बुधवारी या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या सात मागण्यांपैकी उज्जवल निकम यांच्या नियुक्तीची एक मागणी मान्य करण्यात आली आहे. उज्जवल निकम यांच्या नियुक्तीच, हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख यांनी स्वागत केलं आहे. उज्ज्वल निकम यांनी १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेपासून ते मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यापर्यंतचे खटले यशस्वीरित्या लढवले आहेत. मस्साजोगमध्ये सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.आरोग्य पथकाकडून धनंजय देशमुख व संतोष देशमुख यांच्या आई शारदबाई देशमुख यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. धनंजय देशमुख यांनी कालपासून पाणीही घेतलेलं नाही. धनंजय देशमुख यांचा रक्तदाब सामान्य असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली.