मुंबई नाशिक महामार्गावर शहापुर जवळ पाच वाहनांचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू तर १४ जण जखमी
योगेश पांडे/वार्ताहर
ठाणे – मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा अत्यंत भीषण आणि विचित्र म्हणता येईल असा अपघात झाला. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत. त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला अशी माहिती समोर आली आहे. नाशिक महामार्गावर शहापूरातील गोठेघरजवळ पहाटे तीनच्या सुमारास अपघात झाला. माल वाहतूक ट्रकला, बस व मागील एकूण चार गाड्या एकमेकांना धडकल्या. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १४ जण अपघातात जखमी झाले आहेत.माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून या जखमींना शहापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं.
समोर आलेल्या माहितीनुसार गोठेघर या ठिकाणी हा अपघात झाला. या अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मालवाहतूक ट्रकलाच पाठीमागून येणाऱ्या वाहनांनी धडक दिल्याने हा अपघात झाला. या ठिकाणी बचावकार्य तातडीने सुरु करण्यात आलं. अपघातात पाचही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.