भयंकर ! कसारा घाटात ३०० फूट दरीत टँकर कोसळला, दुर्घटनेत ५ ठार, ४ गंभीर जखमी
कसारा – नाशिक मुंबई महामर्गावर नवीन कसारा घाटातील बलगर पॉइंट जवळ दूध टँकरला अपघात झाला आहे. वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा टँकर तीनशे फूट दरीत कोसळला आहे. ह्या घटनेत ५ जण ठार झाले असून ४ जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. रूट पेट्रोलिंग टीम, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि महामार्ग पोलिसांना माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले आहे.
दरम्यान, पावसामुळे मदत कार्यात अडथळा येतो आहे. हायवे पोलीस आणि न्हाई चे समीर चौधरी, सुरज आव्हाड, सचिन भडांगे, शिवा कातोरे देविदास म्हसणे, संदीप म्हसणे, आणि रुग्णवाहीका टीमने दोरीच्या साहाय्याने दरीत उतरून ४ गंभीर जखमींना दरीतून बाहेर काढले. अजूनही तीन ते चार जण अडकले असल्याचा अंदाज आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र कैलास गतीर यांनी जखमींना इगतपुरी आणि कसारा येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
मृतांमध्ये विजय घुगे (वय ६०, रा. निमोण, ता. संगमनेर), आरती जायभाय (वय ३१, रा. नालासोपारा), सार्थक वाघ (वय २०, रा. निहळ, ता. सिन्नर, रामदास दराडे (वय ५०, रा. निहळ, ता. सिन्नर) व चालक योगेश आढाव (रा. राहुरी) यांचा समावेश आहे तर अक्षय विजय घुगे (वय ३०, रा. निमोन, ता. संगमनेर), श्लोक जायभाय (वय ५, रा. नालासोपारा), अनिकेत वाघ (वय २१, रा. निहळ, ता. सिन्नर) व मंगेश वाघ (वय ५०, रा. निहळ ता. सिन्नर) हे प्रवासी जखमी असल्याचे आपत्ती व्यवस्थापन यांनी कळविले आहे.