
दोन तरुणांच्या मृत्यू नंतर पालिकेला आली जाग – अनधिकृत ताडी टपरी केली जमीनदोस्त
दिनेश जाधव : डोंबिवली
कोपरगावातील बेकायदेशीर रित्या उभारलेली टपरीतील ताडी पिऊन दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर अखेर शुक्रवारी महापालिकेला जाग आली आहे. या टपरीवर कारवाई करत ही टपरी जमीनदोस्त केली असल्याची माहिती प्रभाग अधिकारी अक्षय गुडदे यांनी दिली.
मात्र दोन जणांचा जीव गेल्यावर महापालिकेने ही कारवाई केल्याने पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले जात आहेत.
सोमवारी रात्री कोपरगाव मधील गावदेवी मंदिराजवळील रेल्वे रूळाजवळ उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर टपरीची ताडी पिऊन सचिन पडमुख आणि स्वप्नील चोळके या दोन तरूणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.या प्रकरणी रवी बथनी (38,रा. कोपरगाव) याला विष्णूनगर पोलीसांनी कळंबोली येथून अटक केली आहे. पण रवीची ताडी विक्रीची टपरी तशीच उभी होती अखेर महापालिकेवर सर्व स्तरातून टीका होत असताना आज प्रभाग क्षेत्र चे प्रभाग क्षेत्र अधिकारी अक्षय गुडगे व त्यांच्या पथकाने जाऊन सदर टपरी जमीनदोस्त केली.