१५ वर्षापासून व्यवसाय करणारा ज्वेलर्स ग्राहकांचे गहाण ठेवलेले ९८८ ग्रॅम सोनं घेऊन फरार; कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबईच्या कोपरखैरणेमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मागच्या १५ वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या ज्वेलरने ग्राहकांनी गहाण ठेवलेले तब्बल ९८८ ग्रॅम सोने घेऊन आणि ३ लाख रुपयांची रोकड घेऊन पलायन केल्याची घटना घडली आहे.या घटनेने अनेक सर्वसामान्य नागरीकांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने कोपरखैरणेध्ये खळबळ माजली आहे.
ही घटना ‘महालक्ष्मी ज्वेलर्स’ या दुकानाशी संबंधित असून रुपेश गुर्जर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत काम करणारा सुरेश हाही बेपत्ता असल्याची माहिती तक्रारदारांनी पोलिसांना दिली आहे. गुर्जर ग्राहकांकडून सोनं गहाण ठेवून त्यावर व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करत होता. परिसरातील अनेक कुटुंबांनी वर्षानुवर्षे विश्वासाने दागिने त्याच्याकडे ठेवले होते. मात्र काही दिवसांपासून फोन लागत नसल्याने संशय बळावला. ग्राहकांनी दुकान गाठलं असता २२ जानेवारीपासून दुकान बंद असल्याचं दिसून आलं आणि फसवणुकीचा प्रकार उघड झाला.
या प्रकरणातील तक्रारदार अमित फुलचंद चौहान (३६) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात गंभीर आरोप केले आहेत. चौहान हे कोपरखैरणे सेक्टर 19A येथे कुटुंबासह राहतात व पाण्याची टपरी चालवतात. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार १५ वर्षांपासून महालक्ष्मी ज्वेलर्स कोपरखैरणे भागात आहे. ०७ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने दागिने गहाण ठेवून ८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर त्यांनी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी ०४ लाख आणि २९ डिसेंबर २०२५ रोजी रोजी ०४ लाख अशा दोन टप्प्यांमध्ये संपूर्ण पैसे परत केले. या व्यवहाराबाबत व्हॉट्सअपवर संभाषण देखील झाले असून आरोपीने पैसे मिळाल्याचे मान्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे. तरीही वारंवार मागणी करूनही दागिने परत देण्यात आले नाहीत.
२७ जानेवारी २०२६ रोजी रुपेश गुर्जरने ‘२ ते ३ दिवसांत दागिने देतो’ असे आश्वासन दिले, मात्र त्यानंतर त्याचा आणि त्याचा साथीदार सुरेशचा फोन बंद लागला. ०३ फेब्रुवारी रोजी चौहान दुकानात गेले असता २२ जानेवारीपासून दुकान बंद असल्याचे समोर आले. परिसरात चौकशी केली असता दोघेही अचानक गायब झाल्याचे समजले.या प्रकरणात आतापर्यंत २८ तक्रारदार पुढे आले असून त्यांनी १८ ते २४ कॅरेट दरम्यानचे दागिने गहाण ठेवले होते. प्रत्येकाचा कालावधी आणि किंमत वेगवेगळी असली तरी सध्याच्या सोन्याच्या दरानुसार एकूण किंमत दीड कोटी रुपयांच्या घरात जाते. पोलिसांच्या मते, तक्रारदारांची संख्या आणि एकूण रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे. फसवणूक उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. काहींनी लग्नासाठी ठेवलेले दागिने, तर काहींनी आपत्कालीन गरजेसाठी ठेवलेले सोनं गमावल्याचं सांगितलं.
या संपूर्ण प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. सीसीटीवी,आर्थिक व्यवहार आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.